विंग कमांडर (निवृत्त) विनायक डावरे
७ मे २०२५ भारतीय वेळ पहाटे १:०५ ते १:३० या पंचवीस मिनिटांत भारतीय सशस्त्र सेनांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानी पंजाबमध्ये आणि पाक-व्याप्त-काश्मीरमध्ये (POK) मिसाईल-हल्ले करून नऊ ठिकाणांवरील आतंकी-कॅम्प्स नष्ट केले. भारतीय सशस्त्र सेनादलांची अचूकपणे मिसाईल्स डागण्याची क्षमता जमीन, आकाश आणि समुद्रातूनही आहे, हे जगाला ज्ञात आहे. भारताने पाकिस्तानच्या नागरी किंवा सैनिकी तळांवर हल्ले केलेले नाहीत. शत्रूच्या एअर-डिफेन्स सिस्टम्सना (Air-defense systems) चकवण्याचा सराव केल्याशिवाय भारतीय सशस्त्र सेना मिसाईल्स कशी बरे डागतील ? ८ मे २०२५ रोजी सर्व-दलीय बैठक घेऊन, सर्व संसदीय पक्षांना भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत अवगत करवून, ‘ऑपरेशन सिंदूर अभी जारी है’ हेही सांगितले. ‘आम्ही पुढे काय करणार?’, हे सांगायला ते काही पाकिस्तानी मंत्री नाहीत.

(हेही वाचा – मुख्यमंत्री Yogi Adityanath कडाडले; म्हणाले, ‘ब्रह्मोसची ताकद घाबरलेल्या पाकला विचारा’)
सुदैवाने भारताला अनेक दशकांनंतर प्रथमच पंतप्रधान मोदींसारखे कणखर नेतृत्व मिळाले आहे. २२ एप्रिल २०२५ ला इस्लामी आतंक्यांनी केलेल्या २६ हिंदूंच्या पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) निर्घृण नरसंहारानंतर, ‘पृथ्वीच्या अंतापर्यंत जाऊन सर्व आतंक्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणारांचा निःपात करू’ अशी केवळ घोषणा करून न थांबता, पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रूपाने त्या घोषणेचा पहिला चरण अंमलातही आणला. पुढील चरणांत काय काय घडते ह्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत.
अशा वेळी विश्लेषण करणारे आणि सल्ले देणारे अनेक विशेषज्ञ पुढे आले आहेत. योग्य ते विश्लेषण केल्याशिवाय आणि अयोग्य माहितीवर आधारित निष्कर्ष काढले, तर आडाखे चुकू शकतात. कोणत्याही नेतृत्वाला तसे करून चालत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’साठी निवडलेल्या आतंकी- कॅम्प्सची माहिती व्यवस्थित समजून घेतली, तर कोणालाही समजेल की, तेच आतंकी-कॅम्प्स का निवडले? त्यांपैकी चार आतंकी-कॅम्प्स पाकिस्तानी पंजाबात, तर पाच आतंकी-कॅम्प्स पाकव्याप्त काश्मीरात होते. आतंकी-कॅम्प्सची सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे.
१. मर्कझ सुभान अल्ला, बहावलपुर, पंजाब, जैश-ए-महम्मदचे मुख्यालय आणि प्रमुख आतंकी-तळ
सरहद्दीपासून १०० कि.मी., आतंकी मसूद अझरचे वास्तव्य. येथूनच २०१९च्या पुलवामा हल्ल्याचे सूत्रसंचालन केले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये येथे मसूद अझर (जैश-ए-महम्मद), बख्त-उल-झमीन (अल-बद्र) आणि सय्यद सलाउद्दीन (हिसबुल-मुजाहिदीन) यांची बैठक होऊन, तीमध्ये काश्मीरमध्ये आतंकी हल्ले कसे आणि केव्हा करायचे आणि त्यासाठी फंडिंग मिळवणे, इत्यादींचे संयोजन (प्लॅनिंग) केले होते. त्यातूनच सप्टेंबर २०२४ पासून २२ एप्रिल २०२५ (पहलगाम) पर्यंतचे काश्मीरमधील विविध आतंकी हल्ले केले गेले.
२. मर्कझ तय्यबा, मुरिदके, शेखूपुरा, पंजाब, लष्कर-ए-तय्यबाचे मुख्यालय आणि प्रमुख आतंकी तळ
सरहद्दीपासून २५ कि.मी.वर ८२ एकरात पसरलेला हा प्रचंड आतंकी ट्रेनिंग कॅम्प उभारण्यासाठी ओसामा-बिन-लादेन याने २००० मध्ये पाकिस्तानी रुपये १० लाख दिले होते. तेथे लष्कर-ए-तोयबा आणि जमाल-उद-दावा या संघटनांच्या आतंक्यांना प्रशिक्षण दिले जाते. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई आतंकी-हल्ल्याच्या आतंक्यांचे (अजमल कसाब, डेव्हिड कोलमन हेडली, तहव्वूर हुसेन राणा, इ.) प्रशिक्षण येथे केले होते. आतंकी झकी-उर-रहमान ह्याच्या सूचनेवरून, अब्दुल रहमान सईद (पाशा), हारून आणि खुर्रम या आतंक्यांचेही प्रशिक्षण येथे केले होते.
३. सर्जल/तेहरा कलान, शकरगढ़ तहसील, नारोवाल जिल्हा, सियालकोटजवळ, पंजाब
सरहद्दीपासून ६ कि.मी., पाकिस्तानी सेनेच्या (आय.एस.आय.) च्या मदतीने बनवलेल्या जमिनीखालील बोगद्यांमधून जम्मू आणि काश्मीरमध्ये जैश-ए-महम्मद आणि हिजबुल-मुजाहिदीनचे आतंकी पाठवण्याचे लॉन्चिंग पॅड, हेल्थ सेंटरच्या नावाखाली चालवले जाते. चार भारतीय पोलिसांना मार्च 2025 मध्ये मारण्याचे प्लॅनिंग येथून केले होते.
४. मेहमूना जोया, कोटली भुट्टा, हेड मराला, सियालकोट, पंजाब
पाकिस्तानी सेनेच्या आय.एस.आय.ने विशेषतः जम्मू भागामध्ये आतंकी पाठवण्यासाठी सरहद्दीपासून १२ कि.मी.वरील हे लॉन्चिंग पॅड बनविले. २६ जानेवारी १९९५ रोजी जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियमवर हजबुल मुजाहिदीनने केलेल्या हल्ल्याचे (आठ मृत आणि ५० जखमी) मारेकरी ह्या आतंकी तळावरून पाठवले होते. पठाणकोटच्या वायुसेना तळावर केलेला कुप्रसिद्ध हल्ला याच आतंकी तळावरून केलेला होता.
५. मर्कझ अहले हडिथ बर्नाला, भिमबेर जिल्हा, पाक-व्याप्त जम्मू आणि काश्मीर
लाईन ऑफ कंन्ट्रोल पासून ९ कि.मी. वरील हा आतंकी-तळ प्रामुख्याने लष्कर-ए-तय्यबाचे आतंकी जम्मूच्या पूंछ-राजोरी-रियासी ह्या भागांत घुसवण्यासाठी वापरला जातो. लष्कर-ए-तय्यबाचे कुख्यात आतंकी कासीम गुज्जर (उर्फ महारोरे), कासीम खांडा, अनास जरार, महम्मद अमीन भट (उर्फ खुबेब), इत्यादी आतंकी नेहमी या आतंकी-तळावरून कार्यरत असतात. कासीम गुज्जर आणि खुबेब हे आतंकी भारतीय UAPA कायद्याखालील गुन्हेगार म्हणून कुख्यात आहेत.
६. मर्कझ अब्बास, मोहल्ला रोली धारा, कोटली, पाक-व्याप्त जम्मू आणि काश्मीर
लाईन ऑफ कंन्ट्रोल पासून १३ कि.मी. वरील हा आतंकी-तळ जैश-ए-महम्मदच्या आत्मघाती बॉम्बर्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जातो. ह्या आतंकी-तळावर १२५ आतंकी राहण्याची व्यवस्था आहे. ह्या आतंकी-तळावर नेहमी साधारण ४०-५० जैश-ए-महम्मदचे आतंकी हजर असतात. हाफिज अब्दुल शकूर (उर्फ काझी झरार) हा आतंकी जैश-ए-महम्मदच्या कौन्सिल (शूरा) चा सदस्य असून, या मर्कझचा प्रमुख आहे. शिवाय तो हरकत-उल-मुजाहिदीन या मूळ आतंकी-संस्थेचा सदस्य होता. त्याने मसूर अझर बरोबर हरकत-उल-मुजाहिदीन ही आतंकी-संस्था सोडून, जैश-ए-महम्मद ही आतंकी-संस्था सुरू केली.
७. मस्कर राहील शहीद, गुलपुर, कोटली, पाक-व्याप्त जम्मू आणि काश्मीर
लाईन ऑफ कंन्ट्रोल पासून ३० कि.मी. (मीरपूर-कोटली रोड वरील, माहुली-पुलापासून २.५ कि.मी.) वरील हिसबुल मुजाहिदीनचा हा सर्वात जुना आतंकी-तळ असून, प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये आतंकी घुसवण्यासाठी वापरला जातो. २० एप्रिल २०२३ चा पूंछमधील आतंकी हल्ला आणि ९ जून २०२३ चा यात्रेकरूंवरील हल्ला करण्यासाठी ह्या आतंकी तळाचा वापर केला होता. ह्या आतंकी-तळावर १५०-२०० आतंकी राहू शकतात. अबू माझ आणि अब्दुल रहमान हे दोघे आतंकी सध्या ह्या आतंकी-तळाचे प्रमुख असून ते हिसबुल मुजाहिदीनच्या बॉर्डर ऍक्शन टीमला भारतीय सेनेविरुद्ध स्नायपर शूटिंगचे प्रशिक्षण देत असतात.
८. शवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद, पाक-व्याप्त जम्मू आणि काश्मीर
लाईन ऑफ कंट्रोलपासून ३० कि.मी. वरील (मुझफ्फराबाद-नीलम रोडवरील चेलाबंदी पुलाजवळील) हा आतंकी-तळ लष्कर-ए-तय्यबाचा २००० पासूनचा एक महत्त्वाचा आतंकी-तळ आहे. हा आतंकी-तळ आतंक्यांची रिक्रूटमेंट, रजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंगसाठी वापरला जातो. या आतंकी-तळाला हुजेफा-बिन-येमेन किंवा बेत-उल-मुजाहिदीन कॅम्प असेही म्हणतात. या आतंकी-तळावर फायरिंग रेंज, प्रशिक्षण मैदान, लष्कर-ए-तय्यबा मदरसे, राहण्यासाठी चाळीस खोल्या, शिवाय लष्कर-ए-तय्यबा कमाण्डर्स आणि प्रशिक्षकांसाठी राहण्याच्या, इत्यादी सोयी आहेत. या आतंकी तळावर मोठ्या प्रमाणात आतंकी-प्रशिक्षण दिले जाते.
९. सईदना बिलाल मर्कझ, मुझफ्फराबाद, पाक-व्याप्त जम्मू आणि काश्मीर
मुझफ्फराबादच्या लाल-किल्ल्याच्या समोरील सईदना बिलाल मशिदीच्या परिसरात ८-१० कनाल जागेवर हे जैश-ए-महम्मदचे प्रशिक्षण केंद्र उभारले होते. जैश-ए-महम्मदची (Jaish-e-Mohammed) चॅरिटी संस्था अल-रहमत ट्रस्ट ‘हिजामा मेडिकल थेरपी सेंटर’ चालवते. तरी वास्तविक तेथे २०० आतंकी जमावाच्या राहण्याची आणि प्रशिक्षणाची सोय केलेली आहे. एका वेळी साधारण १०० प्रशिक्षणार्थी तेथे राहू शकतात. जैश-ए-महम्मदच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त पाकिस्तानी स्पेशल फोर्सेसचे (SSG) प्रशिक्षणही तेथे दिले जाते. जैश-ए-महम्मदचा पाक-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशनल प्रमुख, मुफ्ती असगरखान काश्मिरी, हा त्या आतंकी-तळाचा प्रमुख आहे. तो हरकत-उल-मुजाहिदीनचा सदस्य होता आणि २००० पासून जैश-ए-महम्मदचा सदस्य आहे. अब्दुल्ला जिहादी (उर्फ अब्दुल्ला काश्मिरी) आणि भारतीय भगोडा आशिक नेन्गरू हेही ह्या आतंकी-तळावरून काम करतात. अनेक आतंकी ह्या तळावरून नियमितपणे पाक-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसवले जातात. अचूकपणे केलेल्या मिसाईल-हल्ल्यांमुळे, वरील नऊ आतंकी-कॅम्प्स नष्ट झाल्यानंतर, जम्मू आणि काश्मीर मध्ये घुसणाऱ्या आतंक्यांना, तात्पुरता का होईना, आळा बसलेला आहे.
आतंकी हल्ले रोखण्याइतकेच आतंकी-फंडिंग रोखणे महत्त्वाचे आहे. ते करण्यासाठी आवश्यक असलेल्या डिप्लोमॅटिक आणि इतर आंतरराष्ट्रीय हालचाली पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांनी ह्यापूर्वीच सुरू केलेल्या आहेत. त्यांना कसे यश येते, हे आपल्याला विदेशांमधून येणाऱ्या बातम्यांमधून वेळोवेळी कळेलच.
पाकिस्तानची प्रतिक्रिया
‘ऑपरेशन सिंदूर’नंतरची आपल्याला समजलेली पाकिस्तानची प्रतिक्रिया ‘क्रॉस-बॉर्डर’ फायरिंग (विशेषतः आर्टिलरी) अशी आहे. ती अपेक्षित आहेच. परंतु पाकिस्तान तेवढ्यावरच थांबणार नाही. भारताने केलेल्या ‘अनपेक्षित’ हल्ल्याच्या उत्तरार्थ, पाकिस्तान काहीतरी ‘मोठे’ करू इच्छित असणार.
पाकिस्तानकडे असलेले पर्याय
१. भारताच्या सैनिकी-तळांवर मिसाईल्स किंवा बॉम्ब हल्ले करणे
भारताने पाकिस्तानच्या नागरी किंवा सैनिकी-तळांवर हल्ले केलेले नसल्यामुळे, तसे हल्ले करणे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या पाकिस्तानला परवडणारे नाही.
हा लेख लिहीत असतांनाच, भारतीय प्रेस इन्फर्मेशन ब्युरोची पोस्ट माझ्या पाहण्यात आली (भारतीय वेळ ८ मे २०२५, २:३४ pm) “पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील पुढील सैनिकी-तळांवर ड्रोन्स आणि मिसाईल्सनी हल्ले केलेले आहेत: (१) अवंतिपुर, (२) श्रीनगर, (३) जम्मू, (४) पठाणकोट, (५) अमृतसर, (६) कपूरतला, (७) जालंधर, (८) लुधियाना, (९) आधमपुर, (१०) भटिंडा, (११) चंदिगढ, (१२) नाल, (१३) फलोदी, (१४) उत्तरलाई आणि (१५) भूज. भारतीय ‘एअर डिफेन्स सिस्टम’ कणखर आहे. प्रत्यक्ष नुकसान किती होते, हे रिपोर्ट आल्यावर समजेल. भारतीय सशस्त्र सेनादलांनी तशाच प्रकारचे हल्ले पाकिस्तानात केले आहेत. लाहोरची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानने युद्ध वाढवले आहे. जर आंतरराष्ट्रीय दबाव आला तर, किंवा पाकिस्तानात सत्ता-परिवर्तन झाले तर, आता हे युद्ध थांबू शकेल.
ॲम्युनिशन संपेपर्यंत पाकिस्तान भारतातील सैनिकी-तळांवर हल्ले करीत राहील. बरेचसे ॲम्युनिशन स्वतः निर्माण करीत नसल्यामुळे, पाकिस्तानला इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. शिवाय भारतीय एअर डिफेन्स सिस्टम (S-400) कणखर असल्यामुळे, पाकिस्तान भारतीय सैनिकी-तळांचे फारसे नुकसान करू शकणार नाही. त्याउलट ॲम्युनिशनच्या बाबतीत भारत बराचसा आत्मनिर्भर असल्यामुळे, इतर देशांवर अवलंबून नाही. पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टम खिळखिळी झालेली असल्यामुळे, भारत पाकिस्तानी सैनिकी-तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकेल.
२. जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) धरणांवर बॉम्ब-हल्ले करणे
‘सिंधू जल-संधी’ला भारताने स्थगित केल्यामुळे, त्या नद्यांचे पाणी रोखणाऱ्या धरणांना लक्ष्य करून बॉम्ब-हल्ले करण्याचा पाकिस्तान विचार करू शकतो. (अ) धरणे फोडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे बॉम्ब्स आणि मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. पाकिस्तानकडे त्या विशिष्ट प्रकारचे बॉम्ब्स, त्या प्रमाणात, उपलब्ध आहेत काय? आपल्याकडे खात्रीची माहिती नाही, परंतु तसे बॉम्ब्स पाकिस्तानकडे उपलब्ध नसावेत. (ब) भारतीय एअर डिफेन्स सिस्टम रोबस्ट असल्यामुळे, ती पाकिस्तान भारतीय धरणांचे काही नुकसान करण्यापूर्वीच, पाकिस्तानी विमाने किंवा मिसाईल्स यांचा निःपात करील.
३. भारताच्या शहरांवर मिसाईल्स किंवा ऍटॉमिक हल्ले करणे
तसे हल्ले करणे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या पाकिस्तानला परवडणारे नसले तरी, पाकिस्तानमध्ये नागरी-नेतृत्वाऐवजी सैनिकी-नेतृत्व शहरांवर मिसाईल्स किंवा ऍटॉमिक हल्ले करण्याचे निर्णय घेते. सैनिकी-नेतृत्वाने तसा निर्णय घेतला, तर पाकिस्तान भारतीय शहरांवर मिसाईल्स किंवा ऍटॉमिक हल्ले करू शकेल. प्रथम लक्ष्य दिल्ली आणि मुंबई ही शहरे राहतील.
भारताचा प्रतिसाद
(अ) भारताची सध्याची पॉलिसी ‘नो फर्स्ट न्यूक्लिअर यूज’ हे. ती पॉलिसी वापरली, तरी भारत प्रतिहल्ला करु शकतो. न्यूक्लिअर प्रतिहल्ल्यामध्ये भारताचे लक्ष्य लाहोर आणि कराची शहरे असतील.
(ब) पाकिस्तानचा संभाव्य न्यूक्लिअर धोका लक्षात घेता, ‘नो फर्स्ट न्यूक्लिअर यूज’ची पॉलिसी भारत बदलू शकतो, विशेषतः ‘डिटरंट’ म्हणून. विश्लेषणातून असे दिसते की, बहुतेक पॉलिसी बदलण्याचा निर्णय भारतीय राजकीय नेतृत्व पुढील एक-दोन दिवसांत घेईल. तसे झाल्यास, पाकिस्तानी सैनिकी-नेतृत्वाला अण्वस्त्रांच्या वापराचा निर्णय घेणे कठीण जाईल.
(क) पाकिस्तानचा संभाव्य न्यूक्लिअर धोका आंतरराष्ट्रीय न्यूक्लिअर शक्तींनाही आलेला आहे. ते स्वस्थ बसणार नाहीत. तसा न्यूक्लिअर धोका प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्या आंतरराष्ट्रीय न्यूक्लिअर शक्ती युद्धबंदीच्या प्रयत्न करतील.
निष्कर्ष
जर आंतरराष्ट्रीय दबाव आला तर, किंवा पाकिस्तानात सत्ता-परिवर्तन झाले तर, आता हे युद्ध थांबू शकेल. (Operation Sindoor)