जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील (Kishtwar) चतरू येथील सिंगपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले. गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगरातील अकोले येथील ब्राम्हणवाडा येथे शुक्रवार, २३ मे रोजी आणण्यात येणार आहे.
हुतात्मा संदीप पांडुरंग गायकर गेल्या सहा ते सात वर्षांपासून सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. मात्र, २१ मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच गावात शोककळा पसरली. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध (Kishtwar) ऑपरेशन दरम्यान जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले.
(हेही वाचा Terrorism : दहशतवाद सुरूच राहिला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील; परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला सज्जड दम)
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड (Kishtwar) येथील जंगलात दहशतवादी असल्याची माहिती भारतीय सैनिकांना मिळाली. यानंतर भारतीय सैनिकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असल्याचे सांगितले होते. पहलगाम घटनेपूर्वी त्याच भागात तीन दहशतवादी मारले गेले होते. हा परिसर काश्मीरमधील अनंतनागच्या सीमेवर आहे. हे दहशतवादी काश्मीरमधून आले असण्याची शक्यता आहे. हे दहशतवादी जैश मोहम्मदचे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या भागात दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
Join Our WhatsApp Community