India-Pakistan Tension : भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या हालचाली होताना पाहायला मिळत आहे. मागील दोन-तीन दिवसापासून भारत-पाकिस्तान यांच्यात सीमेवर मोठा संघर्ष होत असून दोन्ही बाजूने हल्ला करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.
(हेही वाचा Monsoon Update 2025: पावसाची प्रतीक्षा संपली; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज )
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज नवी दिल्ली येथील ७, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी उच्च-स्तरीय बैठक पार पडली.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ पोस्टवरून दिली माहिती
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान @narendramodi यांच्या अध्यक्षतेखाली ७, लोककल्याण मार्ग येथे उच्च-स्तरीय बैठक झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
दरम्यान, भारतीय सैन्यदलांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात असून भारताच्या कारवाईने पाकिस्तान पुरता घाबरगुंडीला आला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सैन्याने केवळ ड्रोन पाडले नाहीत तर पाकिस्तानचे ड्रोन आणि दहशतवादी लाँच पॅड देखील नष्ट केले. यासंदर्भातला व्हिडीओ देखील जारी करण्यात आला.India-Pakistan Tension
Join Our WhatsApp Community