संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यामुळे भाजपा समर्थकांमध्ये दोन गट?

88

शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ घोषित झालं. अनेक दिवस हा निर्णय लांबणीवर होता. विरोधकांनी या कारणामुळे सरकारला धारेवर धरलं होतं. अखेर मंत्रिमंडळ निर्माण झालं आणि पुन्हा एकदा सरकार वादाच्या भोवर्‍यात सापडलं आहे. खरं पाहता संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर चित्र स्पष्ट झालं होतं की, कदाचित ह्यांना मंत्रीपद मिळू शकतं.

नाराजी पसरणे स्वाभाविक

पण मंत्रीमंडळ घोषित झाल्यानंतर ज्यावेळेस संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळाल्याचं जाहीर होताच, भाजपा समर्थक सोशल मीडियावर एकमेकांना भिडले. संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपाच्या नेत्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी जीवाचं रान केलं होतं आणि आता शिंदे सरकार स्थापन झाल्यावर त्याच संजय राठोड यांना मंत्रीमंडळात सामील करुन घेतलं, यामुळे भाजपा समर्थकांमध्ये नाराजी पसरणे स्वाभाविक आहे.

(हेही वाचा धनुष्यबाण होणार कुणाचा, निवडणूक आयोगाचे काय आहेत निकष?)

ही केवळ एक तडजोड

अब्दुल सत्तार यांच्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना राग आहे. भूतकाळात त्यांनी केलेली विधाने हिंदूंना दुखावणारी होती. त्यामुळे आता भाजपा समर्थक आपल्या वरिष्ठांवर रागावले आहेत. आता गंमत अशी आहे की, यावरुन दोन गट पडले आहेत. काहींना हा निर्णय बिलकुल पटलेला नाही तर काहींना राजकारणात अनेक नकोसे वाटणारे निर्णय घ्यावे लागतात असं वाटतंय. खरंतर पाहता या दोन्ही गटाला हा निर्णय पटलेला नाही. परंतु एका गटाला असं वाटत आहे की महाविकास आघाडीसारखं अनैसर्गिक सरकार पडलं. सरकार जर राष्ट्रवादीसोबत मिळून पाडलं असतं तर जनतेचा रोष पत्करावा लागला असता. म्हणून शिवसेनेसारख्या समविचारी गटाला सोबत घेऊन हे सरकार पाडणे श्रेयस्कर ठरलं असतं आणि झालंही तसंच. शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडलं. आता नवं युतीचं सरकार स्थापन करायचं असेल तर भाजपाकडे असलेली मूळ संख्या आणि शिंदे गटाची संख्या असंच गणित साध्य होणार होतं. मग त्यात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार देखील शिंदे गटात सामील झाल्यामुळे आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्यामुळे या दोन नेत्यांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता होतीच. आता काही लोकांना लगेच अब्दुल सत्तार कट्टर हिंदुत्ववादी आणि संजय राठोड हे सभ्यतेचे पुतळे वाटू शकतात. पण असं वाटून घेण्याची गरज नाही. ही केवळ एक तडजोड आहे आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे यामुळे भजपा समर्थकांमध्ये दोन गट पडले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.