महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात दोन दिवस कोरोना बाधितांच्या संख्येत सलग दोन दिवस दुप्पट वाढ झाल्याने राज्यातील कोरोना निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेत दिसताय. राज्यातील कोरोना वाढत असताना लोकांकडून नियमांचे पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबईत माध्यमाशी संवाद साधताना लसीकरणात आपण मागे असून ते योग्य नसल्याचे सांगून त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केले असून १०० टक्के लसीकरणाचा निर्धार टोपेंनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री
राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. दोन दिवसात रूग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामध्ये मुंबईचा पॉझिटिव्ही दर हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यासह दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. मॉल्स, रेस्तराँ, लग्न सर्वांवर निर्बंध लावले आहेत. आपल्याकडे जर आपण सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे नियम पाळावे लागतील. पण जर आपण नियम पाळणारच नसू तर निर्बंधांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
(हेही वाचा – ‘त्या’ पेनड्राईवमध्ये दडलंय काय? रश्मी शुक्ला प्रकरणात न्यायालयाला पडला प्रश्न)
गेल्या दोन दिवसांत रुग्णांचे डबलिंग
गेल्या आठ दिवसात २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, आज १३०० केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होण्याचा अंदाज आहे. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.