महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पारंपरिक भूमिकेला आता व्यापक आर्थिक आणि रोजगारनिर्मितीची (Employment) जोड देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरू झाला आहे. शेतमालाच्या खरेदी-विक्रीपुरती मर्यादित असलेली बाजार समित्यांची कार्यव्यवस्था विस्तारून युवकांना व्यवसाय, कौशल्यविकास आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बाजार समित्या रोजगाराच्या नव्या संधींचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.
कृषी क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योग, साठवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग, विपणन आणि निर्यात या क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मितीला मोठा वाव आहे. या संधींचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना मिळावा, यासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतमालाची बाजारपेठ राज्याच्या सीमांपलीकडे विस्तारण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि कौशल्याधारित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, ईशान्य भारतापासून देशाच्या विविध भागांपर्यंत तसेच जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्रातील शेतमाल पोहोचविण्यासाठी प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि प्रभावी ब्रँडिंगची परिसंस्था उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.
(हेही वाचा मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले असताना DCM Eknath Shinde म्हणाले, गणेशोत्सवात विघ्ने…)
रोजगाराच्या (Employment) या संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांना आवश्यक कौशल्ये मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, व्यवसायविषयक मार्गदर्शन आणि रोजगारदात्यांशी संपर्क उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण युवकांना पारंपरिक रोजगाराच्या (Employment) पलीकडे जाऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळू शकते. दरम्यान, रोजगार महाकुंभाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतींची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विविध बाजार समित्यांचे सभापती, कौन्सिल ऑफ स्टेट ॲग्रीकल्चरल मार्केटिंग बोर्ड्सचे कार्यकारी संचालक जे. एस. यादव, पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Employment)
बाजार समित्यांनी रोजगार महाकुंभासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्टॉल उभारावेत, उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील रोजगारदात्यांना सहभागी करून घ्यावे, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि रोजगाराच्या विविध संधींची व्यापक प्रसिद्धी करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी १ हजार ठिकाणी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार असून, त्यात राज्यातील सुमारे २०० कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार आहेत. बाजार समित्यांच्या माध्यमातून युवकांना रोजगार, व्यवसाय आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असून, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार देणारे उद्योजक बनविण्याचा संकल्प पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. (Employment)
Join Our WhatsApp Community

