गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त होत चाललेल्या कृषी आंदोलनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. अखेर कृषी कायदे रद्द करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि बॉलिवूड अभिनेत्रींवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवले आहे, भिकेत मिळाले नाही.
शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच
दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दहशतीखाली होता. त्या शेतकऱ्यांचे जोखड आता निघाले आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? कंगना रणावत सांगते ते स्वातंत्र्य नाही किंवा विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचं जोखड निघून जाते, फेकले जाते. ते स्वातंत्र्य असते, असा निशाणाही राऊत यांनी साधला आहे. तीन काळे कायदे रद्द होत असल्याने शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले आहे त्यांना ते भिकेत मिळवलेले नाही, असा टोलाही त्यांनी काढला.
(हेही वाचा – रविकांत तुपकर यांचं ‘अन्नत्याग आंदोलन’ तूर्त स्थगित)
मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागितली नाही
पुढे राऊत म्हणाले, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागितली नाही. मोदी हे पंतप्रधान आहेत. अमानुष बहुमताचा गैरवापर करून त्यांनी कायदे आणले. त्यामुळे ७०० शेतकऱ्यांना मरणाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली नाही. कायदे रद्द करण्यात आले पण ते सद्भभावनेने रद्द केलेले नाही. शेतकरी मागे हाटायला तयार नाही आणि असंतोष वाढत चालला आहे. तसेच आगामी १३ राज्याच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला आणि पंजाबसह उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पराभव होईल, या भितीने हा निर्णय घेतला असावा, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community