महाराष्ट्र बॉक्सिंग (Boxing) असोसिएशनमध्ये अध्यक्षपदी झालेल्या वादग्रस्त घडामोडींनी आता राजकीय आणि कायदेशीर वळण घेतले आहे. माजी अध्यक्ष जय कवळी यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनकडे दोन प्रतिनिधींच्या नावांची अवैधरित्या नोंदणी केली, अशी तक्रार आता निवडणूक अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.
जय कवळी यांना २० जानेवारी २०२२ रोजी बॉक्सिंग (Boxing) फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) च्या आदेशानुसार निलंबित करण्यात आल्यावर त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रणजित सावरकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झाली. आजही संपूर्ण कार्यभार तेच चालवत आहेत.
परंतु जय कवळी यांनी ते स्वत: अध्यक्ष असल्याचा बोगस दावा करत महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीत दोन सदस्यांचे नामांकन मतदार म्हणून केले. अर्थात ज्या लेटर हेड वर हे नामनिर्देशन केले त्यावर अध्यक्ष म्हणून रणजित सावरकर यांचेच नाव आहे. याशिवाय बँकेच्या खात्यावर तेच अधिकृत स्वाक्षरीधारक आहेत. याच खात्यातून त्यांनी ५८०००/- महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन चे शुल्क म्हणून ६ ऑक्टोबरला भरले आहेत.
(हेही वाचा Beed जिल्हा कारागृहात धर्मांतर करणाऱ्या कारागृह अधीक्षकाची अखेर बदली)
तरीही जय कवळी यांनी स्वतःला बॉक्सिंग (Boxing) असोसिएशनचे अध्यक्ष असल्याचा दावा केला असून त्याची कुठलीही पडताळणी न करता निवडणूक अधिकाऱ्यांनी कवळी यांनी नामांकित केलेल्या दोन सदस्यांना मतदार म्हणून स्वीकारले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग (Boxing) असोसिएशनने स्पष्ट केले की, या कृतीला कोणताही कायदेशीर आधार नाही.
निवेदनात म्हटले आहे की, अवैध नोंदणीमुळे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या नियमावलीनुसार त्या प्रतिनिधींच्या नोंदणीला मान्यता दिली जाऊ शकत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता पुढील वैध कारवाई करण्याचा मार्ग असोसिएशनला खुला आहे.
अध्यक्ष रणजित सावरकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बॉक्सिंग (Boxing) असोसिएशनने या प्रकरणावर वैधानिक पद्धतीने कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. या घडामोडींचा परिणाम केवळ अध्यक्षपदावर नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या प्रतिष्ठेवरही पडणार असल्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.


