-
ऋजुता लुकतुके
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं. पण, त्यापूर्वी जसप्रीत बुमराहला कप्तानीसाठी विचारण्यात आलं होतं, असं खुद्द त्यानेच स्पष्ट केलं आहे. रोहित शर्मा कप्तान होता, तेव्हा जसप्रीत बुमराहच संघाचा उपकप्तान होता. त्यानंतर कप्तान म्हणूनही त्याच्या नावाची चर्चा होती. पण, गोलंदाजीचा अतिरिक्त ताण झेपणारा नसल्यामुळे बुमराह ५ कसोटींची मालिका सलग खेळू शकणार नाहीए. त्यामुळे त्यानेच कप्तानी नाकारल्याचं आता त्याने स्पष्ट केलं आहे. (India Tour of England)
(हेही वाचा – Public Work Department : वारीपूर्वी महामार्ग सुरक्षित व खड्डेमुक्त करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे निर्देश)
इंडियन प्रिमिअर लीग सुरू असताना संघ प्रशासन आणि जसप्रीत बुमराह यांच्यात चर्चा झाल्याचं आता कळतंय. ‘रोहित आणि विराट निवृत्त होण्यापूर्वीच आयपीएल दरम्यान मी बीसीसीआय आणि निवड समितीच्या सदस्यांशी बोललो होतो. कसोटी मालिका ५ सामन्यांची असेल तर मला पाठीच्या दुखण्यामुळे किती कसोटी खेळता येतील याची स्पष्ट कल्पना मी निवड समिती सदस्यांना दिली. त्यानंतर आम्ही मोठ्या मालिकेत मी किती कसोटी खेळू शकेन यावर चर्चा केली आणि ती झाल्यावरच मी बीसीसीआयला फोन केला. मी पाचही कसोटी खेळू शकत नसल्यामुळे माझा कप्तान म्हणून विचार करू नका, असं मीच बीसीसीआयला सांगितलं,’ असं बुमराहने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं. (India Tour of England)
(हेही वाचा – Iran-Israel conflict : अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने ; इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा)
‘एखाद्याने फक्त २-३ कसोटींतच नेतृत्व केलं. इतर कसोटीत तो अनुपलब्ध असेल तर ते योग्य होणार नाही, असं मलाच वाटत होतं. नाहीतर बीसीसीआयने कप्तानीविषयी मला स्पष्ट विचारलं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर माझं नाव होतं,’ असं बुमराह पुढे म्हणाला. भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेला येत्या २० तारखेला सुरुवात होणार आहे. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका लीड्स, एजबॅस्टन, लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफर्ड आणि ओव्हल इथं होणार आहेत. बुमराह ३ ते ४ कसोटी खेळणार आहे आणि पहिल्याच कसोटीत त्याला विश्रांती मिळेल असा अंदाज आहे. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community