India Tour of England : करुण नायरचं खळबळजनक विधान; लीग खेळण्यासाठी माजी खेळाडूने निवृत्तीचा दिला होता सल्ला

India Tour of England : करुण नायरने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. 

50
India Tour of England : करुण नायरचं खळबळजनक विधान; लीग खेळण्यासाठी माजी खेळाडूने निवृत्तीचा दिला होता सल्ला
  • ऋजुता लुकतुके

कसोटी सामन्यात राष्ट्रीय संघाकडून ३०३ धावा केल्यानंतरही संघातून वगळला गेलेला फलंदाज म्हणून करुण नायर ओळखला जात होता. पण, आपलं नशीब कामगिरीने बदलण्याची जिद्द या पठ्ठ्याने दाखवली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत ९ वर्षांनंतर ३३ व्या वर्षी करुण नायर पुन्हा एकदा भारतीय संघात परतला आहे. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या करुणने एक खळबळजनक माहिती पत्रकारांना दिली आहे. ‘संघात वापसीचं स्वप्न बघण्यापेक्षा निवृत्त हो आणि लीगमध्ये खेळून पैसे मिळव,’ असा सल्ला एका माजी खेळाडूने दिल्याचं करुण नायर म्हणतो. (India Tour of England)

(हेही वाचा – Israel Iran Conflict : इराणचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांचा खात्मा ?; इस्रायलचा मोठा दावा)

त्याचं म्हणणं असं आहे की, ‘त्या खेळाडूचा सल्ला मानला असता तर आता भारतीय संघात नसतो.’ ‘मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा एका माजी क्रिकेटपटूचा मला फोन आला होता. मी निवृत्त व्हावं आणि लीग क्रिकेट खेळून माझं आयुष्य स्थिर आणि सुरक्षित करावं, असा सल्ला त्यांनी मला दिला होता. तो सोपा मार्ग होता. पण, माझं मन मला खात राहिलं असतं. मी शेवटपर्यंत झुंज दिली नाही, ही भावना मनात राहिली असती,’ असं पुढे करुण नायर म्हणाला. मेलस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘भारतीय संघाकडून खेळण्याची इच्छा मी सोडून देऊ शकत नव्हतो. दोन वर्षांपूर्वी मला तो निर्णय घ्यायचा होता आणि मी राष्ट्रीय संघात परतण्यासाठी मेहनतीचा मार्ग निवडला. माझ्यात ती क्षमता आहे, असं मला राहून राहून वाटत होतं,’ असं नायर म्हणाला. (India Tour of England)

(हेही वाचा – India Tour of England : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडला परतला; काय आहे संघात वातावरण?)

नायरने भारतीय ए संघाकडून खेळताना इंग्लिश लायन्सविरुद्ध द्विशतक ठोकलं आहे. पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात त्याचं स्थान पक्कं मानलं जात आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने नायर किमान ३ ते ४ कसोटी खेळेल असं स्पष्ट केलं आहे. २०१६ साली नायर भारतीय संघातून शेवटचं खेळला होता. त्यावर्षी मोहाली कसोटीत इंग्लंड विरुद्ध त्याने ३०३ धावा केल्या. विरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक झळकवणारा तो फक्त दुसरा भारतीय होता. कसोटीतील पहिल्याच शतकाचं रुपांतर त्रिशतकात करणारा तो जगातील फक्त तिसरा फलंदाज होता. पण, पुढच्याच कसोटीत अजिंक्य रहाणे संघात परतल्यावर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेव्हापासून तो संघाबाहेरच फेकला गेला. पण, रणजी स्पर्धेत विदर्भाकडून आणि दुलिप चषकात पश्चिम विभागाकडून सातत्यपूर्ण धावा करत करुण नायर भारतीय संघात परतला आहे. (India Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.