-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत म्हणजेच १० जून २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणी आदी कामे प्रगतिपथावर असून ती येत्या चार दिवसांत पूर्ण होऊन हे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. (Bridge)
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मंगळवारी १० जून २०२५ रोजी कर्नाक पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची पाहणी केली. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अभियंते यावेळी उपस्थित होते. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. १२५ वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये या पुलाचे बांधकाम पाडले होते. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मध्य रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आर. सी. सी. डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. (Bridge)
(हेही वाचा – Bombay High Court : न्यायालयीन कामकाजाचे होणार थेट प्रक्षेपण, मुख्य न्यायाधीश काय म्हणाले?)
या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्याची एकूण लांबी २३० मीटर असून पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्या उभारणीकामी आरसीसी आधारस्तंभ यावर प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्या दोन तुळया (गर्डर) स्थापित करण्यात आल्या आहेत. (Bridge)
वाहतूक पोलिस विभागाच्या विशेष परवानगीने, महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत मागील दोन महिने दररोज २४ तास पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे विक्रमी वेळेत पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण करणे झाले आहे. भार चाचणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) च्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून आणि वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून पूल वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. बांगर पुढे म्हणाले की, दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी ५५० मेट्रिक टन वजनाची पहिली तुळई स्थापित करण्यात आली त्यावेळी उर्वरित सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करणे आव्हानात्मक होते. मात्र, पूल विभागाच्या अभियंत्यांनी आटोकाट प्रयत्न करुन आणि अनेक आव्हानांवर मात करत पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केली आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्येच कर्नाक पुलाच्या पूर्णत्वाची तारीख दिनांक १० जून २०२५ जाहीर करण्यात आली होती. हे उद्दिष्ट गाठण्यात पूल विभागाला यश आले आहे. (Bridge)
(हेही वाचा – Fire : दिल्लीतील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा मृत्यू)
कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे
- मुंबई शहराच्या दक्षिणेतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.
- पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित व वाढीव सुविधा उपलब्ध होणार.
- पूर्व मुक्तमार्गावरून येणारी वाहतूक, तसेच पी. डि’मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.
- पी. डि’मेलो मार्गावरून गिरगाव, चर्चगेट, मंत्रालय, काळबादेवी, धोबी तलाव परिसरात वाहतूक सुविधा.
- युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community