
-
सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेचा कारभारात आता अधिकाऱ्यांनाच स्वारस्य उरलेले नसून, वरिष्ठ अधिकारी काही विचारात घेत नाहीत तसेच पदोन्नती बढतीही देत नसल्याने काही अधिकारी त्रस्त झाले आहेत. तसेच चौकशीचा ससेमीरा मागे लावला जात असल्याने अखेर काही अधिकारी हे स्वेच्छानिवृत्तीच्या पावित्र्यात असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत स्वेच्छानिवृत्तीच्या प्रमाणात बऱ्याच अंशी घट झाली असली तरी येत्या काही दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणात अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील तब्बल ४० ते ४५ टक्क्यांहून पदे रिक्त असून काही विभाग तथा खात्यांमध्ये या रिक्त पदांची टक्केवारी ६० टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे अनेक अभियंते तसेच अधिकाऱ्यांना दोन ते तीन पदांचा भार सांभाळावा लागत आहे. रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर अतिरिक्त कामांचा बोजा टाकला जात असल्याने या कामांच्या बोज्याखाली अधिकारी दबले जात आहेत. यामुळे एकाच वेळी दोन ते तीन विभागांचा भार सांभाळतानाही मूळ पदाव्यतिरिक्त अतिरिक्त सोपवलेल्या कामाची जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झापले जाते, मेमो दिला जातो किंवा त्याप्रकरणी आलेल्या तक्रारींनुसार चौकशी करून त्रास दिला जातो. त्यामुळे अधिकारी वर्गांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे. (BMC)
(हेही वाचा – Cricketer Dies in Train : दिव्यांग क्रिकेटपटूचा रेल्वे प्रवासात मृत्यू; वेळेत मदत न मिळाल्याचा सहकाऱ्यांचा आरोप)
मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागांतच आता प्रमुख अभियंत्यांच्या हाताखालील तीन उपप्रमुख अभियंत्याची पदे प्रभारीच आहेत, त्यामुळे अशाप्रकारच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने कारभार कसा करायचा हा प्रश्न प्रमुख अभियंता आणि खात्याच्या प्रमुखांना पडला आहे. तसेच रस्ते विभाग, जलअभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग, पूल विभाग, मलनि:सारण विभाग तसेच इमारत बांधकाम विभाग, नगर अभियंता विभागांसह इतर विभागांमध्येही पदोन्नती आणि बढती देऊन रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न न झाल्याने अनेकांवर अतिरिक्त कामांची जबाबदारी सोपवली जात आहे. (BMC)
त्यातच सध्या मिठी नदीच्या कामांची चौकशी सुरु आहे. मिठी नदीच्या कामांमध्ये शिल्ट पुशर मशिन प्रकरणी कंत्राट कामांप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने चौकशी सुरु आहे. यामध्ये वरिष्ठांच्या निर्देशानुसार काम करूनही नाहकपणे चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सेवेची २० ते २५ वर्षांपासून सेवा झाल्याने काही अधिकाऱ्यांनी उगाच अशाप्रकारच्या वातावरणात काम करण्यापेक्षा नोकरी सोडून सुखाचे जीवन जगण्याचा विचार करत किंवा खासगी कंपनीत काम करून पुढील जीवन घालवण्याचा विचार करत स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये काही प्रमुख अभियंता, उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अधिकारी, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. (BMC)
(हेही वाचा – TATA Group : भारतीय उद्योग समूहाबाबत कट्टरपंथी संघटनांची बहिष्काराची भाषा; हमास-इस्त्रायल संघर्षाशी कनेक्शन)
स्वेच्छानिवृत्ती घेण्यामागील काय आहेत अधिकाऱ्यांची कारणे –
- वेळेत पदोन्नतीचा लाभ देण्यात टाळाटाळ.
- बढतीचा प्रस्ताव मंजूर करूनही दिला जात नाही लाभ.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणत्याही कामांमध्ये मत जाणून घेतले जात नाही.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कायमच खातेप्रमुखांना दुर्लक्षित करून त्यांच्यावर निर्णय लादले जाणे.
- सर्वच अधिकार अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांनी हाती घेत निर्णय घेणे.
- रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांचा बोजा अंगावर पडणे.
- अतिरिक्त कामांची जबाबदारी निश्चित करून मेमो अथवा चौकशी करणे.
- पोलिस तथा आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात काढून घेणे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community