Operation Sindoor अंतर्गत झालेल्या मागील चार दिवसांची माहिती भारतीय सैन्यदलांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील २-४ दिवसांत पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची पुराव्यानिशी माहिती देण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानचा खोटा दावा तिन्ही सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत खोडून काढण्यात आला. भारतीय सैन्यदलाकडून पुराव्यानिशी कारवाईचे तपशील देण्यात आले आहेत.
पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करणे हे ऑपरेशनचे सिंदूरचे उद्दिष्ट होते, असे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी बेस नष्ट करणे हा ऑपरेशन सिंदूरचा हेतू असून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याच सडेतोड प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून देण्यात येईल. दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावे भारतीय सैन्यदलाकडून पत्रकार परिषदेत दिले गेले.
पत्रकार परिषदेच्या सुरूवातीस लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी माहिती देताना म्हटले की, भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणांची माहिती पटवून त्यावर लष्करी कारवाई केली. भारताकडून कारवाई होईल या भीतीने दहशतवाद्यांनी आपली तळे रिकामी केली होती. परंतु, भारतीय सैन्याने विचारपूर्वक लक्ष्य ठरविले होते. त्यानुसार अचूक कारवाई करत दहशतवादी ठिकाणं नष्ट करण्यात आली.
मरीद, जकोकाबाद, सरगोधा येथे एअर स्ट्राईक केली असून सरगोधा एअरफील्डचा रनवे उद्ध्वस्त करण्यात आला. जम्मू, उधमपूर, पठाणकोट बेसवर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. त्यास भारताच्या गरुड स्नायपरने हाणून पाडण्यात आले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ०९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केली असून या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यामध्ये हायवॅल्यू टार्गेट देखील आहेत अशी माहिती सैन्यदलाने दिली. तसेच, आम्ही तीन प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
आयसी८१४ च्या अपहरणात आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या मुदस्सर खास, हाफिज जमील आणि युसूफ अझहर यांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. यावेळी सैन्यदलांनी यांच्यावरील कारवाईचे फोटो देखील पत्रकार परिषदेत दाखवले. पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा आम्ही मजबुतीने सामना केला. भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या गोळीबारात पाकिस्तानचे ३५-४० सैनिक मृत्युमुखी पडले, अशीदेखील माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली.Operation Sindoor