India-Pakistan War : तणावानंतर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी स्थानिक रुग्णालयाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना ओमर अब्दुल्लाह म्हणाले, काल रात्री जे घडले ते तणाव वाढवण्याचा प्रयत्न होता. जर ते तणाव वाढवतील तर त्यांना सर्वात जास्त नुकसान होईल. त्यांनी तणाव वाढवण्याऐवजी तणाव कमी करून पुढे जावे, असा इशाराच मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांनी दिला.
दरम्यान, परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी पाकिस्तानला शस्त्र टाकण्याचे आवाहन केले. जम्मू विमानतळावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह म्हणाले, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ड्रोन हल्ल्यांना आपल्या संरक्षण दलांनी चोख प्रत्युत्तर देत ड्रोन पाडले. तसेच, काश्मीरच्या अनंतनागमध्ये दारूगोळा डेपोलाही लक्ष्य करण्यात आले होते पण तो प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचेही मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ही परिस्थिती आपण सुरू केलेली नसून पहलगाममध्ये निष्पाप लोक मारले गेले याला आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले. परंतु, पाकिस्तान परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत असून याचा त्यांना कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही. त्यांनी शस्त्रे टाकावीत, त्यांनी तणाव वाढण्याऐवजी तणाव कमी करून पुढे जावे, असेही मुख्यमंत्री अब्दुल्लाह म्हणाले.
दरम्यान, पुंछमधील गोळीबारात मोठे नुकसान झाले असून पुछंमध्ये सर्वाधिक जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या ठिकाणी जखमींची संख्याही जास्त आहे. मी स्वतः जम्मूच्या रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. पुंछमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. उपमुख्यमंत्रीही लवकरच पुंछला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.” असेही ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community