
-
सचिन धानजी, मुंबई
तोट्यात चाललेल्या बेस्टने आर्थिक परिस्थिती सुधारणेच्या दृष्टीकोनातून बस तिकीट दरात दुपटीने वाढ केली आहे. परंतु बेस्ट तिकीट दरात वाढ कल्यानंतरही परिवहन विभागाचा तोटा सुमारे पावणे दोन हजार कोटींच्या आसपासच राहणार आहे. मात्र, सन २०१८-१९ च्या तुलनेत बेस्ट बसच्या प्रवाशांच्या संख्येत २०२३-२४ मध्ये सुमारे सात लाखांनी वाढ झाली असली तरी एकूण उत्पनांच्या तुलनेत मात्र, सुमारे २०० कोटींनी उत्पन्नात घट झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. तसेच सन २०१८च्या तुलनेत बेस्टला या विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या तोट्यातही प्रवाशी संख्या वाढूनही तब्बल १३०० कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Bus Ticket Price Hike)
बेस्ट उपक्रमाचा आर्थिक तोटा वाढतच जात असून यामुळे सध्या परिवहन विभाग हा वार्षिक २३३७ कोटी रुपयांचा तोट्यात चालला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांत बेस्ट बस प्रवाशांची दैनंदिन संख्या २९ लाख ३५ हजार एवढी झाली असून या प्रवाशांकडून एकूण ८४५.७५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर सन २०१८-१९ मध्ये प्रवाशांची एकूण दैनंदिन संख्या ही २२ लाख १० हजार एवढी होती, पण यातून मिळालेल्या महसुलाची रक्कम ही १०३४.७८ ही एवढी होती. (Bus Ticket Price Hike)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : तुर्की पाकिस्तानला आधुनिक ड्रोन पुरवत आहे का? संरक्षण तज्ञ काय म्हणतात ?)
त्यामुळे सहा वर्षांपूर्वी बस प्रवाशांची संख्या कमी असतानाच उत्पन्न अधिक होते, परंतु सहा वर्षांनंतर भाडेतत्वावरील बसेस, वातानुकूलित बसेस, मिडी बसेस, डबल डेकर वातानुकूलित बसेस आदींची सुविधा देण्यात आल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असली तरी तिकीट दर हा किमान पाच आणि सहा रुपये एवढाच असल्याने प्रत्यक्षात या परिवहन विभागाचा होणारा एकूण खर्च वगळता उत्पन्न गृहीत धरले तर तोट्याची टक्केवारी ४९ व]रून आता ७३ टक्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मागील सहा वर्षांमध्ये बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा हा अधिक वाढल्याने आता बस तिकीट दरात दुप्पट वाढ करण्यात आल्याने तोटा भरुन निघणार नसला तरी तोट्याच्या टक्केवारीचे प्रमाण कमी होणार आहे,असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. (Bus Ticket Price Hike)
बेस्ट प्रकरणी आढावा बैठक घेतल्याने मुख्यमंत्र्यांचे राजा यांच्याकडून अभिनंदन
बेस्ट समितीचे माजी ज्येष्ठ सदस्य आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एक्सवर पोस्ट करत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेताना बेस्ट प्रशासनाने आता स्वतः उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत आणि त्यासाठी बेस्ट डेपोच्या जागांचा वापर करून त्यातून कसे आर्थिक स्रोत निर्माण करता येईल याचा विचार करावा असे स्पष्ट निर्देश दिले. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. (Bus Ticket Price Hike)
बेस्ट प्रशासनाच्या दोन मुख्य जबाबदाऱ्या आहेत, एक म्हणजे प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देणे आणि दुसरं म्हणजे स्वतःचे आर्थिक स्रोत तयार करणे. पण गेली अनेक वर्ष मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणावर बेस्ट प्रशासनाला निधी देत आहे आणि तरीही ‘बेस्ट’चा कारभार सुधारला नाही. आता बेस्ट प्रशासनाने स्वतःचे आर्थिक मार्ग शोधून त्यातून मुंबईकरांना उत्कृष्ट सेवा द्यावी. मुख्यमंत्री महोदयांनी बेस्ट आगारांच्या जागेचा विचारही करावा असे निर्देश दिले. त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने टीका केली आहे, पण ही टीका करताना ते स्वतः विसरत आहेत की, जवळपास ७ बेस्ट आगारांचा पुनर्विकास हा शिवसेना उद्धव गटाच्या महापालिकेच्या सत्ताकाळात झाला आहे. त्यांच्या सत्ताकाळात जर बेस्टच्या कारभाराला शिस्त लावली असती तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दांत राजा यांनी टिका केली आहे. (Bus Ticket Price Hike)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack Live Update : पंतप्रधान मोदी यांची सैन्याला कारवाईसाठी पूर्ण सूट; उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनिती)
असा आहे मागील सहा वर्षांतील बेस्टच्या परिवहन विभागाचा उत्पन्न आणि खर्चाचा गोषवारा :
सन | दैनंदिन प्रवासी संख्या | एकूण उत्पन्न | खर्च | तोटा |
---|---|---|---|---|
२०१८-१९ | २२ लाख १० हजार | १०३४.७८ | २०४७.६३ | १०१२.८५ |
२०१९-२० | २५ लाख ०८ हजार | ८३३.९६ | २२५८.७६ | १४२४.८१ |
२०२०-२१ | १४ लाख ७७ हजार | ५०८.३६ | २६३१.७३ | २१२३.३७ |
२०२१-२२ | २१ लाख १९ हजार | ८८५.२७ | २७२८.४० | १४८३.१३ |
२०२२-२३ | २९ लाख १७ हजार | ८६३.२२ | ३०२३.४० | २१६०.१८ |
२०२३-२४ | २९ लाख ३५ हजार | ८४५.७५ | ३१८३.६८ | २३३७.९३ |
हेही पहा –
Join Our WhatsApp Community