
-
प्रतिनिधी
पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रक्रियेत स्वतः पुढाकार घेतला असून, “प्रत्येक नागरिकाला सुरक्षित घरी परत आणणे हीच प्राथमिकता आहे,” असे स्पष्ट केले आहे. पर्यटकांना जलद आणि सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष विमानसेवेची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे. (Pahalgam Terrorist Attack)
अजित पवार यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने मदत पुरवण्याची विनंती केली. तसेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक मदत मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करून अडकलेल्या पर्यटकांशी समन्वय साधला जाणार आहे. (Pahalgam Terrorist Attack)
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार घाला; उत्तरप्रदेशच्या आमदाराचे आवाहन)
या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृतदेहांना श्रीनगरहून मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींना आवश्यक उपचार मिळावेत आणि हॉटेलमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुरक्षित सुटका व्हावी, यासाठीही अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. त्यांनी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना धीर देत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. “काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये, संयम राखावा,” असे आवाहन त्यांनी केले. (Pahalgam Terrorist Attack)
राज्य सरकारने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क ठेवले आहे. पर्यटकांची यादी, त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांची माहिती आणि परतीच्या वेळापत्रकाचे संकलन केले जात आहे. कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती पुरवली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर अजित पवार स्वतः लक्ष ठेवून असून, केंद्र आणि राज्य यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत आहेत. केंद्र सरकारनेही चार विशेष विमाने श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी रवाना केली असून, गरजेनुसार आणखी विमाने पाठवली जाणार आहेत. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, एकूण २६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community