राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, महावितरणकडून थकीत वीज बिलामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले. त्यामुळे वीज बिल सक्ती आणि विमा कंपन्याच्या दादागिरी विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. वीज बिल सक्ती आणि विमा कंपन्याच्या दादागिरी विरोधात ठाकरे गटाकडून 1 डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. हे चक्काजाम आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना औरंगाबाद जिल्ह्यात 8 ठिकाणी करणार आहे.
(हेही वाचा – ‘या’ राज्यात बिडी-सिगरेटच्या नशेत मुली आघाडीवर, वयाच्या ७ व्या वर्षापासूनच मुली करतात धुम्रपान!)
शेतकरी अडचणीत असताना त्यांचे वीज कनेक्शन बंद केले जात आहे. रब्बीचा हंगाम सुरू असून पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण वीज बंद करत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानानंतर देखील वीज कंपनीकडून थेट रोहित्र बंद करण्यात येत आहे. या कारणामुळेच आता ठाकरे गट रस्त्यावर उतरणार आहे, असेही अंबादास दानवे यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील या 8 ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार आहे.
- इसारवाडी फाटा, गंगापूर
- शिऊर बंगला, वैजापूर
- पिशोर नाका, कन्नड
- सह्याद्री हॉटेल समोर, पैठण
- आंबेडकर चौक, सिल्लोड
- टी पॉइंट, फुलंब्री
- भक्तनिवास समोर, रत्नपुर
- करमाड, औरंगाबाद