मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

221

पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची भीषण धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. महामार्गावरील उर्से गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे.

नेमके काय झाले?

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मावळ तालुक्यातील उर्से गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अद्याप मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि तिने ट्रकला धडक दिली. यामध्ये चालकासह दोन प्रवाशांचा जागीच जीव गेला.

( हेही वाचा: CBI ची मोठी कारवाई; पाच सरकारी अधिकाऱ्यांसह दोन खासगी व्यक्तींना अटक )

प्रचंड वाहतूक कोंडी

हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या साहाय्याने कटरच्या मदतीने कारमधील मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने चुराडा झालेली कार रस्त्याच्या बाजूला केली आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.