CM Eknath Shinde : मुंबई उपनगरातल्या नालेसफाईची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; तडकाफडकी केली ‘ही’ कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नाल्यात उतरून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला.

164
मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांवरून सध्या राजकीय वातावरण तापले असतानाच वर्षानू वर्ष कायम त्या नाल्यांच्या सफाईची पाहणी करायची व पावसाळ्यात जर मुंबईत पाणी तुंबले तरं पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांची सवय अंगवळणी पडलेल्या पालिका अधिकाऱ्यांना शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच दणका दिला.
गुरुवारी मुंबई शहरातल्या नालेसफाईची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी आपला मोर्चा मुंबई उपनगरात वळवला. सुरुवातीला त्यांनी सांताक्रूझ येथील मिलन सबवे येथील नालेसफाईच्या कामाकडे आपला मोर्चा वळवला. त्यावेळीं हा नाला अस्वच्छ असल्याचे व त्याची योग्यरित्या त्याची सफाई झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले असता त्याची तातडीने दखल घेत त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे पर्जन्य आणि जलवाहिन्या विभागाचे मुख्य अभियंता विभास आचरेकर यांना जागेवरच कारणे दाखवा नोटीस बजावली. मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे पालिका अधिकारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अंधेरी येथील गोखले पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यासोबतच या पुलाखाली मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच यावेळी त्यांनी गोखले पुलाचे काम येत्या दिवाळीपर्यंत जलदगतीने पूर्ण करावे असे सक्त निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले. तसेच हा पूल सुरू होईपर्यंत बाजूचा रेल्वेचा पूल पादचाऱ्यांना वापरण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी स्वतः पश्चिम रेल्वेचा महाप्रबंधक यांच्याशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नाल्यात उतरून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा ओशिवरा येथे नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईकडे वळवला व तेथील नालेसफाईचे काम पाहिले. यावेळी त्यांनी स्वतः नाल्यात उतरून सुरू असलेल्या कामाचा आढावाही घेतला. तसेच यावेळी नालेसफाई करणाऱ्या कामगारासोबत संवाद साधून त्यांचे काम जाणून घेतले तसेच त्याला या कामाबद्दल शाबासकीही दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरवर्षी पाणी साचत असलेल्या पोईसर नदीची पाहणी केली. दरवर्षी या नदीपात्रात पाणी साचल्याने आजूबाजूचा परिसर जलमय होतो. काठावरील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो. त्यामुळे या नदीपात्रातील गाळ देखील उपसून पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार योगेश सागर,आमदार विद्या ठाकूर आमदार प्रकाश सुर्वे,  मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल आणि सहाय्यक आयुक्त पी वेलारासु हेदेखील उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.