खासदारांची पेन्शन बंद करा; कोणत्या खासदाराने पंतप्रधान मोदींनाच लिहिले पत्र

94

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे सरकारी कामावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत थेट खासदारांना दिले जाणारे निवृत्ती वेतन बंद करण्याची मागणी होत आहे. ही मागणी कुणी सर्वसामान्य व्यक्तीने केली नाही तर खुद्द आजी खासदाराने केली आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक खासदारांना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यातील माजी खासदारांची आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रही पाठविले. त्यामुळे धानोरकर यांच्या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. भारतीय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकूण 4796 माजी खासदार आहेत. या माजी खासदारांवर दरवर्षाला 50 कोटी रुपयांची रक्कम पेन्शनच्या माध्यमातून खर्च केली जाते. यातील जवळपास 300 माजी खासदारांचे आश्रित परिवार देखील सहभागी आहेत. माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, मायावती, सीताराम येचुरी, मणिशंकर अय्यर, अभिनेत्री रेखा, चिरंजीव आणि अनेक मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे या आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या माजी खासदारांची निवृत्ती वेतनाची रक्कम बंद करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. एकूण 300 माजी खासदारांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या खासदारांच्या कुटुंबीयांनाही पेन्शन दिली जात आहे. काही माजी खासदार आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहेत. तेही अजून पेन्शन घेत आहेत. त्यांना निवृत्ती वेतन देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

(हेही वाचा छत्रपती संभाजीनगरनंतर आता पुण्यात ईडीची छापेमारी; बिल्डर्स आणि काॅन्ट्रॅक्टरर्सची चौकशी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.