सुदानमध्ये परिस्थिती गंभीर! भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची विशेष योजना

194

अंतर्गत हिंसाचाराने ग्रासलेल्या सुदानमध्ये काही भारतीय नागरिक अडकलेले आहेत. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. भारतीय नागरिकांसाठी भारताने जेहादमध्ये दोन सी – १३० जे ही लष्करी वाहतूक विमाने सज्ज ठेवली आहेत.

( हेही वाचा : विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार प्रगतीपुस्तक! शिक्षणाधिकाऱ्यांनी काय दिले आदेश?)

सुदानमध्ये नक्की काय आहे परिस्थिती

अरब राष्ट्रांच्या सीमेवर आफिक्रेतील सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत हिंसाचार उसळला आहे. यामध्ये एका भारतीयासह किमान १०० जणांचा बळी गेला आहे. साडेचार कोटी लोकसंख्या असलेल्या या देशावर ताबा मिळवण्यासाठी दोन लष्करी अधिकाऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बळी जात आहे.

वाद कुठून सुरू झाला? 

ओमर अल बशिर यांच्या प्रदीर्घ हुकुमशाहीनंतर सुदानमध्ये एप्रिल २०१९ मध्ये राज्यक्रांती झाली. त्याबरोबरच लोकशाही प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि देशात अब्दल हमदोद यांचे हंगामी सरकार अस्तित्वात आले. लष्कर आणि नागरी आंदोलकांमध्ये झालेल्या करारानुसार यंदा निवडणुका होणार होत्या, पण २०२१ मध्ये बुरहान आणि दगालो यांनी हंगामी सरकार उलथवले. मग सुदानमध्ये पुन्हा लष्करी राजवट प्रस्थापित करण्यात आली. त्यानंतर बुरहान आणि दगालो महत्त्वाचे नेते बनले. जुलै २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकांपर्यंत आपणच देशाचे नेतृत्व करू असे दोघांनी जाहीर करून टाकले. मात्र त्यानंतर निमलष्करी दलाच्या अस्तित्वावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले? 

भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपात्कालीन योजना तयार ठेवण्यात आल्या आहेत. पण भारताची हालचाल ही तेथील सुरक्षा परिस्थितीवर अवलंबून असेल असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. तसेच आपात्कालीन उपाय म्हणून तेथील बंदरात आयएनएस सुमेधा ही नौदलाची नौका पाठविली आहे. दरम्यान सौदी अरेबियाने सुदानमधून मित्रदेशांच्या ६६ नागरिकांची सुटका केली आहे. यात काही भारतीय आहेत असे सौदी अरेबियात तर्फे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.